सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी कराडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आंदोलन
सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी कराडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आंदोलन
कराड, दि. 20 - शेतकरी कामगार पक्ष व बळीराजा शेतकरी संघटना, व रासप यांनी संयुक्तपणे कराडमध्ये सोयाबीनला रास्त हमीभावा प्रमाणे दर नाही, तसेच सरकारने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावी यासाठी सहकार उपनिबंधक कराड तालुका कार्यालयच्या दारात, चटणी भाकरी खाऊन सरकारचा व व्यापाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी शेकाप जिल्हाध्यक्ष एड. भाई समीर देसाई यांनी सोयाबीन हंगाम सुरू होऊन एक महिन्याच्या वर लोटला तरी, सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने सुरू केली नाहीत. आज सोयाबीनचा हमीभाव 5300 रुपये आहे, तरी व्यापारी 4,000 ने सोयाबीन खरेदी करत आहेत, हा शेतकऱ्यांच्या वर घोर अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड नाही. शेतकरी सोडून सर्वजण आनंदाने गोडधोड करून दिवाळी साजरी करत आहेत, पण शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी ही अंधारमय झाली आहे. साखर कारखाने सुरू होऊन ही, अद्याप ही ऊस दर जाहीर केलेला नाही, बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावेत, अन्यथा ऊस कारखाने बंद पाडू असा इशारा समीर देसाई यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणात सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकारने या आठवड्यात निर्णय नाही घेतला तर, 'आम्ही सातारा येथे जिल्हा सहकार कार्यालयात जाऊन उग्र आंदोलन करू'. यावेळी रासप अध्यक्ष मनोज उबाळे यांनी व्यापाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला, यापुढे सरकार बरोबर व्यापाऱ्यांनाही धडा शिकवू असा सज्जड इशारा दिला. यावेळी एडवोकेट अमित लाड, संजय जाधव, भाई, अरुण डुबल, संजयव जगताप, व इतर शेकाप व बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment