स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ
स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ
कराडला 26 डिसेंबर पासून प्रदर्शन, तयारीस वेग
कराड, दि. 17 - शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा दि. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार असून, या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाचे हे प्रदर्शन २० वे वर्ष असून कृषी व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन व उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील–उंडाळकर यांच्या शुभहस्ते आज बुधवार, दि. १७ रोजी करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, सर्जेराव गुरव, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, जयंतीभाई पटेल, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासो पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संचालक सर्जेराव गुरव व कोयना बँकेचे संचालक संपतराव बडेकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले हे देशातील एकमेव कृषी प्रदर्शन असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान या माध्यमातून मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विविध बाबींसह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, आत्मा विभाग तसेच कराड व मलकापूर नगरपरिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
मंडप भूमिपूजनानंतर बोलताना ॲड. उदयसिंह पाटील–उंडाळकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती सदैव तत्पर असून, शेतकरी केंद्रबिंदू मानून संस्था कार्यरत आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.” यावर्षी सुमारे ४०० स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनाच्या मंडप व्यवस्थेबाबत माहिती देताना धीरज तिवारी यांनी सांगितले की, “पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ४०० स्टॉल्स, स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नवीन तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्सचा समावेश असेल. उंचीचा मंडप असल्याने हवेशीर वातावरण राहणार आहे.”
मंडप व परिसरात सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, शेतकरी हित लक्षात घेऊन १०० स्टॉल्स शेतकरी बांधवांसाठी मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, हणमंतराव चव्हाण, संपतराव इंगवले, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, उत्तमराव जगताप, श्रीमंत काटकर, यशवंत बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, स्व. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, माजी उपसभापती अशोक पाटील–पोतलेकर, आनंदराव सुतार, सुनील पाटील, रोहित पाटील, विजयसिंह यादव, अधिकराव गरुड, हिम्मत थोरात, संपतराव बडेकर, वसंत पाटील, सचिन पाटील तसेच डायनॅमिक इव्हेंटचे मॅनेजर धीरज तिवारी यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment