भारतीय सभ्यतेचा -हास गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ. मोहोळकर
भारतीय सभ्यतेचा -हास गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ. मोहोळकर
औंध, दि. 25 - जगप्रसिध्द अशी भारतीय सभ्यता -हास होत आहे, ही बाब चिंताजनक असून त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. सुहन मोहन मोहोळकर यांनी व्यक्त केले.
डॉ. मोहोळकर औंध-खटाव येथील लक्ष्मणराव इनामदार शासकीय औ. प्र. संस्थेत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एकात्म मानव दर्शन या विषयावर आयोजित व्याख्याना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. वाय. एस. कारंजकर होते. कार्यक्रमास आयएमसी सदस्य श्री. डी. जे. पवार उपस्थित होते.
डॉ. मोहोळकर म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी १९६० च्या दशकात मांडलेले विचार हे आजमितीलाही लागू होतात. त्यांनी मानव विकास हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा निरोगी असण्यावर अवलंबून असल्याचे म्हटले होते. त्यांनी समाज, कुटुंबव्यवस्था सुदृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करताना अंत्योदयाची संकल्पना मांडली. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावातून युवापिढी बाहेर काढण्यासाठी वैचारिक मशागत गरजेची आहे, त्यासाठी अशा व्याख्यानांची आवश्यकता आहे.
यावेळी प्राचार्य श्री. कारंजकर यांनीही मार्गदर्शन केले. श्री हरिहर तोडकर यांनी आभार व्यक्त केले. लक्ष्मणराव इनामदार शासकीय औ. प्र. संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ निदेशक श्री ए. ए. आवळे व मुख्य लिपीक श्री. एस. टी. गोलीवडेकर यांनी परिश्रम घेतले.


Comments
Post a Comment