सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन वाघांचे स्थानिकाकडून नामकरण
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना स्थानिक लोकांनी दिली नावे ‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’
कराड, दि. 25- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांमध्ये वाघा विषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड, आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
लोकांनी दिलेली नावे
•एसटीआर–टी१ :सेनापती
• एसटीआर–टी२ : सुबेदार
• एसटीआर–टी३ : बाजी
सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. 2018 सालानंतर 2023 साली दिनांक 17 डिसेंबर रोजी पाच वर्षानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एस.टी.आर. टी १ असा देण्यात आला.
कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा 100 किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक एस.टी.आर. टी २ असा ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ 2025 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यामुळे त्याला एस.टी.आर. टी ३ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. हाच वाघ कोकणातून चिपळूण वनपरिक्षेत्रात देखील जाऊन आला होता.
सध्या एस.टी.आर. टी १ , एस.टी.आर. टी २ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यान मध्ये असून एस.टी.आर. टी ३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे.
शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नाव देण्यात आली आहेत एस.टी.आर. टी १ या वाघाला सेनापती तर एस.टी.आर. टी २ या वाघाला सुभेदार आणि एस.टी.आर. टी ३ या वाघाला बाजी असे नाव देण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांची नावे स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांच्या नावे देण्यात आली आहेत एस.टी.आर. टी १ हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प झाल्याने लढाई ज्याप्रमाणे सेनापती सर्वप्रथम येतो त्यावरून या वाघाला हे नाव देण्यात आले आहे.
“आपल्या सह्याद्री व्याघ्र राखीवातील वाघांना स्थानिक लोकांनीच ही लोकप्रिय नावे दिली आहेत. यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते, त्यांच्याशी आत्मीय नातं जुळतं आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते. ‘सेनापती’, ‘सुबेदार’ आणि ‘बाजी’ ही नावे सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची व परंपरेची आठवण करून देतात.
– तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर
सध्या विदर्भातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे. यातून भविष्यात सह्याद्री प्रकल्प परिसरात स्थावर व्याघ्र व एकूण च व्याघ्र परिसंस्थेचे संवर्धन यशस्वी रित्या होण्यात मदत होईल.
– किरण जगताप, उप संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना
लोकांनीच नावे देणे हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळात संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे.
- रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक
ऑपरेशन ‘तारा’-
लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्या टप्यात दोन वाघीण हे पेंच व्याघ्र प्रकल्प व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहेत. याला ऑपरेशन ‘तारा’ असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन ‘तारा’ सारख्या शास्त्रीय मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे. ऑपरेशन ‘तारा’ या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा एक महत्वकांकशी व्याघ्र प्रकल्प आहे, जो सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे.
वाघांबरोबर येथील जैविविधता यांचे रक्षण होणार आहे.... पर्यायाने येथील जल स्तोत्र शाबूत व सुरक्षित राहतील , तर जंगले, वन्यजीव वाचणार आहेत. या निर्णयामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे.




Comments
Post a Comment