ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -शेखर चरेगावकर
'यशवंत'च्या ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - शेखर चरेगावकर
बँकेच्या कर्ज बुडव्यांनी आधी कर्ज भरावे मग आरोप करावेत...
कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार; बँकेचा एक रुपया ही मी घेतला नाही - चरेगावकर
कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - यशवंत बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन ते बुडवणारे संजीव कुलकर्णी माझ्यावर खोटेनाटे आरोप करत वकिलाच्या माध्यमातून खोटी कर्ज प्रकरणे व बोगस संस्था दाखवून घोटाळा केल्याचे सांगणारे हे कुलकर्णी कोर्टात का जात नाहीत. अपील का करत नाहीत, कोणतेही पुरावे नसताना केवळ स्वार्थासाठी माझी प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान सुरु असून हे मी कदापी खपवून घेणार नाही व मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी असून मी घाबरणारा नाही. त्यामुळे यशवंत बॅंकेत कोणतेही गैरव्यवहार झालेले नाहीत. कर्जदार व ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
कुलकर्णी व त्यांना मदत करणाऱ्या काही जणांनी हायकोर्टात अपील दाखल केले मात्र त्या ठिकाणी त्यांना अपील मागे घ्यावे लागले. 101 चा दाखला प्राप्त केला तर अपील करत असताना नियमाला धरून 50% रक्कम द्यावी लागते एवढं ज्ञान सुद्धा त्यांना व त्यांच्या वकिलांना नाही. आणि यानंतर केवळ दहा पैशाच्या अर्जावर अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती व काही नेत्यांच्यापासून अनेक ठिकाणी हे फिरत असल्याचे सांगून चरेगावकर म्हणाले, माझ्यावर खोटे व बिन बुडाचे आरोप करणारे संजय कुलकर्णी हेच बँकेचे कर्जबुडवे आहेत. त्यांनी इतर कर्जबुडव्यांना खोटी माहिती देत त्यांना बरोबर घेऊन माझी बदनामी सुरू केली असल्याचे सांगून चरेगावकर म्हणाले. या कर्जबुडव्यांनी वेगवेगळी शासकीय कार्यालय, आमदार, खासदार, मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. अनेक ठिकाणी केलेल्या तक्रारींचे निकाल त्यांच्याच विरोधात लागले आहेत. आता खासदारांना भेटून राजकीय आश्रय मिळवत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे. यामध्ये शहा यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले असून मी सीबीआय सह कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी असल्याचे ही चरेगावकर म्हणाले.
बँकेच्या माध्यमातून दहा ते बारा हजार महिलांना बचत गटाच्या रूपाने कर्ज वितरण केले त्यानंतर कोरोना काळात परतफेड करण्यात काही महिला अयशस्वी ठरल्या तर काही महिला गायब झाल्या. काही महिलांनी अजूनही पैसे भरले नसल्याचेही यावेळी चरेगावकर यांनी सांगितले. कर्ज वसुल करणे ही प्राथमिकता असल्याचे सांगून चरेगावकर म्हणाले, संजय कुलकर्णी हे यशवंत बँकेचे कर्जदार असून त्यांचे कर्ज थकल्यामुळे बँकेने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या असून त्याची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे त्यांचे पित्त खवळले आहे. यापुर्वीही त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन खोटेनाटे आरोप करत ठेवीदारांची दिशाभूल सुरू ठेवली आहे. यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. बँकेच्या कर्जदारांनी पैसे भरल्यामुळे 220 कोटींवरुन ठेवी 140 कोटींवर आल्या आहेत. 70 ते 80 कोटी रुपये ठेवीदारांचे परत केले आहेत. मला कर्ज घेऊन बँक बुडवायची असती तर, मी वाई अर्बन बॅंकेचे कर्ज काढलेच नसतं असेही ते म्हणाले.
माझे व माझ्या नातेवाईकांच्या बॅंकेत सात-आठ कोटींच्या ठेवी बँकेत पैसे ही असल्याचे सांगून आरोप करणाऱ्यांची एक रुपयाचीही ठेव बॅंकेत नसल्याचे चरेगावकर यांनी यावेळी सांगितले. बॅंकेत कोणतेही गैरव्यवहार झालेले नसून व्यवहार करताना काही तांत्रीक दोष राहिले असतील; त्याला धरुन तुम्ही आरोप करत असाल तर, पहिल्यांदा त्यांनी स्वतःचे कर्ज भरावे. बँकेचे कामकाज व्यवस्थित सुरू असून ठेवीदारांच्या पैसे व्याजासह देण्यासाठी बँक सक्षम आहे. त्यामुळे खोटेनाटे आरोप करणाऱ्या लोकांवर यशवंत बँकेच्या ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही चरेगावकर यांनी यावेळी केले.

Comments
Post a Comment