यंदाचा स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर....
यंदाचा स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर....
उंडाळे येथे स्वातंत्र्य सैनिक अधिवेशनात माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांचे हस्ते पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण....
कराड दि.15-उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार या वर्षी जैन इरिगेशन सिस्टिमस जळगावचे अध्यक्ष अशोक जैन यांना जाहीर केल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. धनाजीराव काटकर, यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त 41 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. या अधिवेशनात या पुरस्काराचे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्य यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. रविवार दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे असे ही कणसे म्हणाले.
अशोक जैन यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान असून जैन इरिगेशन च्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित तुषार व ठिंबक सिंचन प्रणालीवर 45 पिकापेक्षा जास्त पिकावर उत्पादन तंत्र विकसित केले.या कृषी पध्द्तीमुळे 50 टक्के पाण्याची बचत झाली या बरोबर त्याचे समाजकार्य सुरू असून या एकंदरीत योगदानाबद्दल श्री जैन यांचा यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय स्वातंत्र सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले होते. 1973 पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. गतवर्षी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मकरंद अनासपुरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सदर राष्ट्रीय कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने शेवटी ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.

Comments
Post a Comment