गोंडस बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका : आ. पृथ्वीराज चव्हाण...
गोंडस बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका : आ. पृथ्वीराज चव्हाण...
पवारवाडी (नांदगाव) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ...
कराड दि.18-: नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संविधानामध्ये बदल करण्याची भाषा करतात. तरीही मोदी गप्प आहेत. या लोकांना संविधानसुद्धा धोक्यात आणायचे आहे. बहुजन आणि दलितांचे विचार तोडून देशात भिन्नता वाढवत तेढ निर्माण करायचा त्यांचा डाव आहे. यातून येणारी तिसरी लोकसभा निवडणूक मोदींनी जिंकल्यास देशातील लोकशाही संपेल. असे सांगून राज्यातील जनता फितुरीला साथ देणार नाही. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत येवून कोणी गोंडसपणे आश्वासने सांगतील. त्यांच्या नादाला लागू नका. असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पवारवाडी (नांदगाव) येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या उद्धघटन समारंभात ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे - पाटील, सवादेचे उपसरपंच नितीन थोरात, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, अधिकराव जगताप, उदय पाटील (आबा), अश्विन चव्हाण, देवदास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, भाजपला विरोधी पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे एका पक्षाची सत्ता म्हणजे एका पक्षाची हुकुमशाही होणार आहे. हे जाणून लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत जागृत राहणे गरजेचे आहे. मोदींना हरवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडी झाली आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी रहावे.
ते म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघात काही ठराविक गावांना टँकर लागतो. त्यामध्ये पवारवाडीचे नाव पुढे असते. या गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नदीतून पाणी योजना करणे व वनक्षेत्रातील पाझर तलावाचे पुनर्जीवन करणे, हे दोन उपाय आहेत. पहिला उपाय सुरू झाला आहे. यातून सोलर योजनेवरील पथदर्शी सुमारे ७० लाख रुपयांची पाणीयोजना पूर्ण होईल. पुढील कालावधीत पाझर तलावातील पाण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
ते म्हणाले, कराड दक्षिणमधील अडचणीचे अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दळणवळण व पाण्याचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील आहे. उंडाळे प्रादेशिक योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मी सरकारकडे आग्रह केला. या योजनेचे पुनर्जीवन होणार आहे. व नव्याने समाविष्ठ केलेल्या ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात शुद्ध पाण्याचा पुरवठा मिळणार आहे.
उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ४० ते ४२ पाणीयोजना मार्गी लागल्या आहेत. परंतु काही मंडळी या योजनांचे श्रेय घेत आहेत. विरोधकांचा भूलथापांचा खेळ ओळखावा. या प्रतिगामी लोकांकडून आपण सर्वांनी वाचले पाहिजे.
मनोहर शिंदे म्हणाले, यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर व पृथ्वीराजबाबा हे वैचारिक नेते आहेत. या नेत्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. पृथ्वीराजबाबांनी ओंडोशी येथे दीड किलोमीटर चालत जावून पाझर तलावाची पाहणी केली. यातून त्यांची विकासाविषयीची तळमळ अधोरेखित होते.
अजितराव पाटील म्हणाले, सद्या पक्षाच्या फुटीवरून सगळीकडे चर्चा आहे. पक्षनिष्ठा काय असते, हे विलासकाका आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून शिकावे.
नांदगावचे माजी सरपंच टी. के. पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. सागर कुंभार यांनी प्रास्ताविक केले. आकाश तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. नांदगावचे उपसरपंच अधिकराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी पाणी योजनेच्या विहीरीस सयाजी शिंदे व शिवदास शिंदे यांनी जागा दिल्याबद्दल तसेच ग्रामसेविका शोभा जाधव, शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांचा सत्कार करण्यात आला. संपत पवार, उपसरपंच विनायक पवार, संतोष पवार, हरिश्चंद्र पवार, रामचंद्र पवार, अशोक पवार, पांडुरंग पवार, रवींद्र येलवे, रवींद्र पवार, संजय खोत, जितेंद्र चव्हाण, चंद्रकांत पवार यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकराव जगताप यांची तुफान टोलेबाजी...
कार्यक्रमात वडगाव हवेलीच्या अधिकराव जगताप यांनी जोरदार टोलेबाजी करत अतुल भोसले यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला. पृथ्वीराजबाबांनी मतदारसंघाची काळजी करू नये. असे सांगून अधिकराव जगताप म्हणाले, दीड वर्षाला सरासरी एक पक्ष याप्रमाणे भोसले पिता - पुत्रांनी पंधरा वर्षात अनेक पक्ष बदलले आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कोणाच्या मालकीचा व कसा उभा केला, याचे उत्तर भोसले देत नाहीत. रेठऱ्याची पाणीयोजना नीट चालवता येत नाही. रेठऱ्यात विलासकाका आणि पृथ्वीराजबाबांनी विकासकामे दिली आहेत, याची जाण असू द्या. असे सांगून ते म्हणाले, भाजप चोराला दडवणारा महाचोर पक्ष आहे. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Comments
Post a Comment